Friday, March 15, 2019

भय इथले संपत नाही

व्हाट्सअप्प वर काल एक व्हिडिओ आला.. सीएसएमटी चा एफओबी कोसळला. आधी वाटलं की अफवा आणि जुना व्हिडीओ असेल.. पण बघितलं तर परिसर ओळखीचा वाटत होता.. आणि खरच तोच एफओबी होता.. कन्फर्म करण्यासाठी टीव्ही चालू केला तर बातम्यांमध्ये पण तेच दाखवत होते..२ मृत आणि ३० जखमी.. व्हिडीओ बघून कळत होतं की आकडा नक्कीच वाढेल..
डोळ्यासमोर फ्लॅशबॅक आला.. साडेसहा वर्ष (२००६-२०१३) कमीत कमी दिवसातून एकदा तरी ह्या पुलाचा वापर व्हायचा.. मरिन लाईन्स मध्ये ऑफिस असल्याने ह्या पुलाने जाणे येणे सोयीचे असायचे.. २००८ साली कसाब चा टाइम्स च्या छायाचित्रकाराने काढलेला फोटो तो ह्याच पुला वरचा.. अनेक सिनेमांमध्ये, लक्षात राहण्या सारखे म्हणजे स्लमडॉग मधील शेवटचा सीन देखील याच पुला वरचा..
खूप राग, उद्विग्नता, हतबलता, आणि आपण काय म्हणतो ते स्पिरीट ऑफ मुंबई अश्या अनेक भावना एकाच वेळी उफाळून आल्या.. सर्वांच्याच मनात ज्यांच्या साठी लोकल प्रवास हा आयुष्याचा एक अविभाजनीय भाग आहे..
आज काही कामा निमित्त सी एस एम टी ला आलो तेंव्हा जाऊन आलो.. पाडकाम चालू होते.. टीव्ही चॅनल्स च्या ओबी व्हॅनस, रिपोर्टर, पोलीस, फायर ब्रिगेड, एन डी आर एफ, पालिका अधिकारी इ. आणि माझ्याच सारखे आजूबाजूला बरेच जण..एवढे लोक असून पण शांतता.. कव्हरेज करणारे रिपोर्टर फक्त बोलत होते ते तेव्हढे..
लोअर परळ, अंधेरी आणि आता सी एस एम टी.. आणि पुढे न जाणे किती..
काल फुटबॉल चा खेळ सुरू झाला.. हा पूल आमचा नाही.. त्यांचा.. अहो आमचा नाही .. त्यांचा आणि हेच एक कारण आहे की हे पूल पडत आहेत.. रिपेअरिंग करायच्या वेळी पण असाच फुटबॉल चालू असेल..
महत्वाचे म्हणजे पुलावर टाईल्स लावताना कुठे जातो हो हा फुटबॉल ? ती कामं कशी होतात तत्पर ? असो..
तर ह्या टाईल्स देखील सगळी कडे अश्या लावल्या आहेत की बहुतांशी लोकांचे पाय घसरतात .. गुळगुळीत.. बऱ्याच ठिकाणी ग्रॅनाईट देखील..
ही सर्व दिरंगाई होण्याचं कारण एकच, ते म्हणचे बहुतांशी जे बाबू, नोकरशहा आणि इतर मंडळी जे ह्या बाबतीत निर्णय घेतात ते ह्या गोष्टींचा वापर करण्या ची शक्यता खूपच कमी आहे.. जर वापर करत असते तर स्वतः च्या जिवाच्या काळजीने तरी योग्य ते डिसीजन घेतले असते..
खालील उपाय योजना करणे खूप गरजेचे आहे
१. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या रिझर्वेशन मध्ये जसा आयुर्विमा, अपघात विमा आहे, तसा सर्व उपनगरीय तिकिटे आणि पासेस या मध्ये द्यायला हवा..
२. रेल्वे संबंधित अपघात.. क्रॉसिंग करताना, गर्दीतून पडल्यामुळे, दगड-फुगे लागल्या मुळे इ. सर्व अपघात त्यात समाविष्ट करावे
३. सर्व नोकरशहा, बाबू आणि लोक प्रतिनिधींना दर महिन्यातून किमान काही दिवस सार्वजनिक दळण वळण आस्थापना- लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, शेअर कॅब-ऑटो यांचा वापर करणे बंधनकारक करावे
४. क्राउड सोर्सिंग द्वारे.. सर्वसामान्य लोकांची मते-अडचणी समजून घेण्यासाठी एक मंच उपलब्ध करून द्यावा.. आणि त्या वर योग्य तो अंमल करण्यात यावा
आपल्या सूचना देखील सोशल मीडिया मधून दूरवर पोहोचू द्या.
आपण सर्वांचेच आयुष्य मौल्यवान आहे.. आपण सर्व नक्कीच जास्त चांगले सार्वजनिक जीवन डिझर्व करतो.
संकेत देशपांडे, कल्याण
@sanketvd : twitter

No comments:

Post a Comment